मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच सरकार मजबुत आहे असे जरी शरद पवार म्हणत असले तरी मी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, असं वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केलं आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थिर नाही आहे तसंच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकारला पाडण्याची काहीच गरज नाहीये. ते आपोआपच पडेल, असंही राणे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, ही माझी वैयक्तिक मागणी असल्याचं राणे म्हणाले आहेत. तसंच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील भाजपचं असं मत नसल्याचं सांगितलं आहे.
दुसरीकडे ठाकरे सरकार स्थिर आहे, असं शपद पवार आणि संजय राऊत यांनी सांगितलं आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करतं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे, असं शरद पवार म्हणाले आहे.